बेलखेड | प्रतिनिधी
बेलखेड गावाची लोकसंख्या अंदाजे १४ हजारांच्या आसपास असूनही आजपर्यंत गावात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने केवळ एक पाण्याचा फिल्टर प्लांट बसविण्यात आला असला, तरी तो अपुरा ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, गावाजवळून वान धरणाचे पाणी इतर भागात पाईपलाईनद्वारे पुरवठा केले जात असताना बेलखेड गाव मात्र पाण्यासाठी वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था गावकऱ्यांची झाली आहे.
गेल्या जवळपास दोन वर्षांपासून गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून ते अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या टाकीचे बांधकाम साधारण १५ ते २० फूट उंचीपर्यंत झाले असले तरी काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दररोज हजारो नागरिकांना गावाबाहेरून स्वतःच्या वाहनाने, सायकलने किंवा डोक्यावर पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
केंद्र शासनाची “हर घर जल” योजना गावात नेमकी कधी पोहोचणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करावे व गावाला नियमित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.









