श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी उत्साहात गुणगौरव करण्यात आला.
अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मिटिंग हॉल येथे आयोजित कार्यक्रमात संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक प्रा. वसंतराव चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक सचिव राजकिशोर मोदी म्हणाले की, “विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहेत. अपयशाला न घाबरता ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. पालक आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो.”
ते पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी राज्यभरात शहराचे नाव उंचावले असून, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, विविध सुविधा व नव्या युगाशी सुसंगत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. अंजली संजय लोहिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित गुरुजनांचाही सन्मान करण्यात आला.
यानंतर दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आदित्य जिजाराम कावळे, ऋत्विज दत्तात्रय कुलकर्णी, कौस्तुभ ज्ञानेश मातेकर तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
विद्यार्थी व पालकांनीही मनोगत व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी केले. आभार आंबाड सर यांनी मानले.
या कार्यक्रमास श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुषण मोदी, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, पत्रकार, शिक्षक, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.









