कळंब तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
कळंब- भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, कळंब तालुक्यातील काही शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज उभारण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
कळंब तालुक्यातील खामसवाडी व मंगरूळ येथील महावितरण कार्यालये तसेच मस्सा(ख) येथील महावितरण कार्यालय आणि आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतीवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उभारण्यात आला नसल्याचे आढळून आले. याविषयी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी फोटोच्या पुराव्यासह उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिन हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या त्यागाची आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची आठवण करून देणारा राष्ट्रीय महत्त्वाचा दिवस आहे. अशा दिवशी शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर नियमानुसार राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असताना संबंधित कार्यालयांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज न उभारणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही. त्यामुळे ध्वजारोहणासाठी जबाबदार अधिकारी कोण होता आणि राष्ट्रध्वज न उभारण्यामागील कारण काय होते, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी विरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.
बॉक्स
महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर ग्रामीण भागात सुध्दा असे नमूद करून राष्ट्रध्वज उभारण्यात यावा असे आदेश दिले होते. तरीही अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज न उभारणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध पुराव्यासह तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल मुळे, सामाजिक कार्यकर्ते कळंब.










