“देवलगाव आवचार फाट्याजवळील घटना”
परभणी / प्रतिनिधी :
भावाच्या लग्नासाठी जामखेडहून परभणीकडे येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या कारला अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि. १३ मे) मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार फाटा येथे घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील सहा जणांचे प्राण वाचले असून कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील आकाश फाळके हे एमएच-१४ एनई-१७२८ क्रमांकाच्या इर्टिगा कारमधून आपल्या कुटुंबीयांसह परभणीकडे निघाले होते. गुरुवारी त्रिधारा येथे आयोजित विवाह सोहळ्यासाठी हे वऱ्हाडी मंडळी जात होते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कार देवलगाव आवचार फाट्याजवळ पोहोचली असता अचानक वाहनाच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच मोठा स्फोट झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक आकाश फाळके यांनी तत्काळ गाडी थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
क्षणातच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि काही वेळात वाहन जळून खाक झाले. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तीव्र उष्णतेमुळे वाहन गरम होऊन स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.










