नाशिक प्रतिनिधी :
उन्हाच्या तीव्र झळांपासून वाहनचालक आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नाशिकमधील त्रिमूर्ती चौक सिग्नलवर अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला असून, दीपक भाऊ बडगुजर यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
नवीन नाशिक येथील त्रिमूर्ती चौक सिग्नलवर वाहनचालकांना सिग्नल सुरू होण्याची प्रतीक्षा करताना उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी विशेष सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वाहनधारकांना काही क्षण तरी उन्हापासून आराम मिळत असून नागरिकांकडून या कल्पनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम आदर्शवत मानला जात आहे.
या उपक्रमानंतर आता नाशिक शहरातील इतर प्रमुख सिग्नलवरही अशीच सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. नागरिकांनी सांगितले की, “सिग्नलवर थांबताना काही क्षण तरी सावली मिळाल्यास मोठा दिलासा मिळतो. ही योजना शहरभर राबविणे गरजेचे आहे.”









