आजरा : प्रतिनिधी
आजच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये वाढता दिखावा, अवाजवी खर्च आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारी उधळपट्टी ही चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, आर्टिस्ट आणि सहकारी संस्थेचे कर्मचारी हसन तकीलदार यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
कोणताही गाजावाजा, बडेजाव किंवा खर्चिक सोहळा न करता त्यांनी आपल्या मुलाचे लग्न आजरा येथील आमराई गल्लीतील मशिदीत शांततेत आणि साध्या पद्धतीने लावून दिले.
साधेपणातून दिला सामाजिक संदेश
हसन तकीलदार हे मागील ४० ते ४२ वर्षांपासून पेंटर म्हणून कार्यरत असून विविध बोर्ड तयार करण्याच्या कामामुळे तालुक्यात परिचित आहेत. तसेच ते गेल्या ३० वर्षांपासून एका सहकारी संस्थेत सेवेत आहेत.
समाजात वाढत चाललेल्या लग्नातील अनावश्यक खर्चाला आळा बसावा, वधूपक्षावर आर्थिक ताण येऊ नये आणि विवाह हा दिखाव्याचा नव्हे तर संस्कारांचा सोहळा असावा, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
मर्यादित उपस्थितीत विवाह सोहळा
मौलाना, काझी, जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. अनावश्यक गर्दी आणि खर्च टाळण्यासाठी विवाहाची माहितीही मर्यादित ठेवण्यात आली होती.
“समाजासाठी मार्गदर्शक आदर्श”
तकीलदार यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांचे मित्र दयानंद भोपळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “साधेपणाने विवाह करून तकीलदार सरांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अशा पद्धतीमुळे कुटुंब आर्थिक कर्जाच्या ओझ्यात अडकत नाही आणि समाजात सकारात्मक संदेश जातो.”
पैगंबरांच्या शिकवणीचे पालन
हसन तकीलदार यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या साधेपणाच्या शिकवणीचे पालन करत विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्या या निर्णयाचे आजरा तालुक्यासह जिल्हाभरातून स्वागत होत असून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







