शैक्षणिक क्रांतीचे प्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
ऐतवडे बु. ता. वाळवा, जि. सांगली : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, जनतेचे दीपस्तंभ आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतवडे बु. येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयराज पाटील यांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कर्मवीरांचे विचार हे प्रेरणादायी विश्व आहे. स्वावलंबन, कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकशिक्षणाचा त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे.”
ते पुढे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ज्ञानाची ज्योत ग्रामीण भागात पोहोचली आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली.
समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीरांनी उभारलेली वसतिगृहे, शिक्षणप्रसाराची तळमळ आणि समाजकारणातील योगदान यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
“कर्मवीरांनी घडवलेला माणूस म्हणजे कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि लोकहितासाठी झटणारा खरा सामाजिक योद्धा,” असेही जयराज पाटील यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.






