६५ लाखांची रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली : प्रतिनिधी
नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ८ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ५ जहाल नक्षल्यांनी शनिवारी (दि. १६) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या कारवाईनंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी व कंपनी सदस्य जन्नी उर्फ नगी येमला, तसेच जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
पोलिसांनी या कारवाईत नक्षल्यांकडून ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून एके-४७, एसएलआरसह इतर बंदुकांचा मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भामरागड तालुक्यातील फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले होते. त्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही नक्षल्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील चार नक्षल्यांना तेलंगणातून, तर उर्वरित आरोपींना कुमनार आणि नैताळा परिसरातून अटक करण्यात आली.
५ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण
पोलिस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे. या नक्षल्यांमध्ये विभागीय समिती सदस्य, प्लाटून समिती सदस्य, क्षेत्रीय समिती सदस्य आणि दलम सदस्यांचा समावेश असून शासनाने त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
“सशस्त्र संघर्ष संपला, पण विचारधारेवर लक्ष ठेवणार”
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाविरोधातील सशस्त्र संघर्ष आता संपुष्टात आल्याचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. मात्र, नक्षलवादी विचारधारा पूर्णपणे संपली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे इतर राज्यांतून नक्षलवादी गडचिरोलीत प्रवेश करू नयेत यासाठी पोलिसांकडून सतत सतर्कता ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


