मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तालुक्यात पर्यायी रोजगाराच्या संधी कमी असल्याने कास्तकार पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, सततची नापिकी, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत.
मागील हंगामात मोठ्या प्रमाणात नापिकी झाली असतानाही अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. त्यामुळे आता नव्या हंगामासाठी खत, बियाणे आणि इतर कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ भांडवल उरले नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कास्तकारांनी एकजूट दाखवत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नव्याने कर्जवाटप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जेष्ठ कास्तकारांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील हंगामातील नापिकीमुळे आर्थिक नुकसान झाले असून, कर्जफेडीनंतर शेतकऱ्यांकडे नव्या पेरणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नव्या कर्जवाटपासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
पावसाळा आणि खरीप हंगामासाठी आता अत्यंत कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रशासनाने वेळ न दवडता शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील कास्तकारांकडून व्यक्त केली जात आहे.







