मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या आणि शासकीय योजनांबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे शिबिर अनेक नागरिकांच्या मते अपेक्षाभंग करणारे ठरल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शिबिरात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील अनेक नागरिकांनी दिवसभर उन्हात थांबून आपली उपस्थिती दर्शविली. मात्र, “आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळू शकणार नाही,” असे सांगून अनेकांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यावर संतप्त प्रतिक्रिया देताना नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर आमचे आधार कार्ड अपडेट नसते, तर आम्हाला बँकेचे व्यवहार आणि रेशन कार्डवरील धान्य कसे मिळाले?” त्यामुळे आधार पडताळणी प्रक्रियेत प्रशासनाचा घोळ असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या शिबिरामुळे सुमारे ७० टक्के नागरिकांची मजुरी बुडाली असून, कोणताही ठोस लाभ न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महसूल विभागाने महसूल वसुलीत प्रथम क्रमांक मिळविण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तसेच घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, नगरपंचायतीमार्फत मंजूर कामांचे धनादेश क्लिअर का होत नाहीत, असे प्रश्नही नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केले.
स्थानिक प्रशासन या गंभीर तक्रारींकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांच्या समस्यांवर काय तोडगा काढते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांनीच या समस्या प्रतिनिधींना सांगितल्या असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.







