मारेगाव, प्रतिनिधी
मारेगाव शहर हे वणी ते यवतमाळ महामार्गावर वसलेले महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपशाच्या विरोधात आता संताप व्यक्त होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल पावटा सचिव प्रफुल सदाशिव आदे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असून संबंधितांवर प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थींना रेती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांची घरे रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.
“अवैध रेती माफियांवर तातडीने कारवाई करावी आणि घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी करत त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आमरण उपोषणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

