मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये घराघरांत नळ कनेक्शन देण्यात आले असले तरी नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांनी आरोप केला आहे की, पाणी सोडण्याच्या वेळेबाबत संबंधित कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक नळांवरून स्वतंत्र पाईप जोडून पाणी नेले जात असल्याने इतर नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचीही तक्रार समोर आली आहे.
“प्रत्येकाच्या घरी नळ कनेक्शन असताना सार्वजनिक नळांवरून पाणी नेण्याची गरज काय?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांवर नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत आणि नियोजनबद्ध करण्यासाठी नगरपंचायतीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








