परभणी / प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याला मानवत नगरपरिषद क्षेत्रात आज, दि. 16 मे 2026 पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 14 जून 2026 पर्यंत म्हणजेच 31 दिवस चालणार आहे.
ही जनगणना भारतीय जनगणनेच्या इतिहासातील सोळावी, स्वतंत्र भारतातील आठवी तसेच 21 व्या शतकातील तिसरी जनगणना ठरणार असून, विशेष म्हणजे भारतातील ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मानवत नगरपरिषद क्षेत्रात एकूण 11 वॉर्ड असून त्यासाठी 66 गट निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामासाठी नगरपरिषदेच्या वतीने 11 पर्यवेक्षक आणि 65 प्रगणक अशा एकूण 76 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत.
कामाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी कोमल सावरे यांनी पर्यवेक्षक आणि प्रगणकांना जनगणनेच्या कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जनगणना कार्यनिर्देशालय, महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने प्राप्त जनगणना किटचे वाटपही करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, घरगणनेदरम्यान प्रत्येक कुटुंबाची माहिती, सदस्य संख्या, राहणीमान, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती नोंदवली जाणार आहे. ही माहिती शासनाच्या विकास आराखड्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने नागरिकांनी प्रगणकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.
या कार्यक्रमास जनगणना विभाग प्रमुख भारत लक्ष्मणराव पवार, जनगणना लिपिक पंकज पवार, तांत्रिक सहाय्यक जुनेद शेख उस्मान, शिपाई लाईक अन्सारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









