आंबेगाव दिगर येथील शेतकऱ्याच्या सोलार प्लेट फुटल्या; भरपाईची मागणी
परभणी / प्रतिनिधी :
सेलू तालुक्यातील आंबेगाव दिगर येथे दि. १४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या “मागेल त्याला सोलार” योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील अनेक सोलार प्लेट तुटून फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आंबेगाव दिगर येथील गट क्रमांक ७७ मधील शेतकरी भागवत आश्रोबा साखरे यांनी आपल्या शेतात सोलार प्लॅन्ट उभारला होता. मात्र अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेट कोसळून फुटल्या. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी भागवत साखरे यांनी संबंधित सोलार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सोलार प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वादळी वाऱ्यात सोलार प्लेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आता संबंधित कंपनी आणि प्रशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत व भरपाई देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









