सारथी महाराष्ट्राचा
प्रतिनिधी | | इंदापूर
जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना इंदापूर तालुका व बारामती तालुक्याच्या वतीने महावितरण विभागीय कार्यालय (परिमंडळ) ऊर्जा भवन, बारामती येथे आयोजित ऊर्जा मित्र बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक कार्यकारी अभियंता संजय सोनवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत ग्राहक संरक्षण परिषद पुणे सदस्य दिलीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न घाडगे, वजन-माप प्रमुख दिलीप दुपारगुडे, ऊर्जा प्रमुख तानाजी खैरे तसेच बारामती तालुका अध्यक्ष श्याम कुमार उपस्थित होते. यावेळी बारामती शहर, ग्रामीण, सोमेश्वर, वालचंदनगर व इंदापूर उपविभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील गंभीर प्रश्नांवर थेट आणि आक्रमक भूमिका मांडण्यात आली. इंदापूर व बारामती तालुक्यात ग्रामीण भागात “सहा ते दहा” लोडशेडिंग लागू केले जाते, मात्र बारामती शहराला त्यातून सूट का दिली जाते? असा थेट सवाल प्रशासनाला करण्यात आला.
तसेच “मागेल त्याला सोलर”, कुसुम सौर योजना, प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणि स्मार्ट योजना यामध्ये शेतकऱ्यांना सहा ते आठ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. योजनांची प्रत्यक्ष जनजागृती कितपत प्रभावीपणे केली जाते, याबाबतही प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
सपकळवाडी गावातील स्वतंत्र फिडरसाठी दि. २४ मार्च २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. “गावासाठी फिडर बसविण्याच्या कामासाठी नेमकी कालमर्यादा किती? आणि विलंबासाठी जबाबदार कोण?” असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला.
बैठकीत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले :
- ग्रामीण भागातील अनियमित व वाढते लोडशेडिंग
- ठराविक वेळापत्रक नसलेला वीजपुरवठा
- सहा ते दहा तास लाईट बंद ठेवून वारंवार वाढवले जाणारे शटडाउन
- कर्मचाऱ्यांची वर्तणूक व शिस्तभंग कारवाई
- वीजबिल वाटपातील त्रुटी
- ग्राहकांच्या नावातील बदल प्रकरणे
- शेतकऱ्यांच्या पिकांचे विजेमुळे झालेले नुकसान
- सौर योजनांच्या मंजुरीतील विलंब
जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेच्या वतीने शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडण्यात आली. विशेष म्हणजे सपकळवाडी फिडरचे काम एक ते दोन दिवसांत पूर्ण करून जोडणी करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत दिले.
या बैठकीत ग्राहक संघटनेने केवळ प्रश्न उपस्थित न करता ग्रामीण भागातील वीज, शेतकरी आणि ग्राहकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवत उत्तरदायित्वाची मागणी केली. त्यामुळे ऊर्जा मित्र बैठकीत ग्राहक संघटनेचा आवाज प्रभावीपणे उमटल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.








