लातूर | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत माहिती दिली.
जाहीर कार्यक्रमानुसार, २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ निश्चित करण्यात आली असून, अर्जांची छाननी २ जून रोजी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी राहणार आहे.
या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.








