प्रतिनिधी | | इंदापूर
इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. उन्हाळी हंगामासाठी मिळणारे दुसरे पाणी आवर्तन अद्यापही सोडण्यात आले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर २ चौकात रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्याचे कृषिमंत्री असलेल्या तालुक्यातच शेतकऱ्यांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याअभावी आधीच शेती संकटात सापडली असताना उन्हाळी आवर्तन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आज सकाळपासून इंदापूर तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने डाळज नंबर २ चौकात एकत्र आले. “शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या”, “उन्हाळी आवर्तन सुरू करा”, “शेती वाचवा” अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन वेळेत न मिळाल्याने पिके धोक्यात आली आहेत. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता शेती टिकवण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जोपर्यंत पाण्याबाबत ठोस निर्णय होत नाही आणि आवर्तन सुरू करण्याबाबत स्पष्ट आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
खडकवासल्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून इंदापूर तालुक्यातील शेतकरी आता अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









