सोयगाव प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात इंधन टंचाईची समस्या तीव्र होत असून शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरठाण येथील अमृतेश्वर पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर पोहोचताच डिझेल भरण्यासाठी शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वरठाण परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डिझेल मिळवण्यासाठी काही शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर, पंप आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाहनधारकांनाही अनेक तास रांगेत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






