शिरूर, पुणे | प्रतिनिधी :
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय, शिरूर यांच्या वतीने आदरणीय ब्रह्मकुमारी अर्चना दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १८ मे २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत रामलिंग रोड, शिरूर येथे आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिबिरामध्ये मुलांसाठी एकाग्रता, आत्मविश्वास, नैतिक मूल्ये, चांगले संस्कार तसेच ध्यानधारणा यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यांनी शिबिराचे महत्त्व आणि चांगल्या संस्कारांची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच ब्रह्मकुमारी सुप्रिया दीदी यांनी विद्यालयाची ओळख करून देत विविध चित्रांच्या माध्यमातून ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी मुलांसाठी स्मरणशक्ती वाढविणारे खेळ आणि ध्यानधारणा सत्रांचेही आयोजन करण्यात आले.
आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये आदर्श संस्कार रुजविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुलांमध्ये चांगल्या सवयी, मोठ्यांचा आदर, अभ्यासाचे महत्त्व, आत्मविश्वास आणि मनोबल कसे वाढवावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
“संस्कार हे योग्य वयातच घडवले जातात,” या उद्देशाने ब्रह्मकुमारी विद्यालय जगभर विविध माध्यमांतून सेवा कार्य करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वासंती दीदी, सुमन दीदी, पूजा दीदी, सुनीलभाई, गवळीभाई तसेच नितीनजी बारवकर सर यांनी विशेष सहकार्य केले. शिबिराचे पुढील चार दिवस विविध उपक्रमांनी भरलेले असणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.









