प्रतिनिधी :
सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ६०० ते ७०० रुपये इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र लाल कांद्यानंतर आता उन्हाळी कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.
केंद्र शासनाने कांदा खरेदीसाठी प्रतिक्विंटल १२३५ रुपये दर जाहीर केला असला तरी तो अत्यल्प असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव, निर्यातवाढ आणि आर्थिक अनुदानाची मागणी जोर धरू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन ग्राहक शोधून कांदा निर्यात वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, वीज, इंधन आणि मजुरीचे वाढते दर यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे बाजारभाव घटल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे.
भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखावे, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी शासनाकडे केली आहे.









