कल्याण | प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक भागांमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असताना टिटवाळा अ प्रभागात मात्र मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. टिटवाळा, बनेली, बल्याणी आणि वासुंद्री परिसरातील सरकारी व मोकळ्या जमिनींवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून चाळी उभारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या भागात पालिकेचे वरिष्ठ पदाधिकारी वास्तव्यास असतानाही बेकायदा बांधकामांचा वेग कमी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील पाच ते दहा वर्षांत टिटवाळा परिसरात आठ ते दहा हजार बेकायदा चाळी उभारण्यात आल्या. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही जागरूक नागरिकांनी या प्रकरणाच्या तक्रारी ईडी, आर्थिक गुन्हे शाखा आणि शासनस्तरावर केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतून आले, भूमाफिया बनले
स्थानिकांच्या दाव्यानुसार, मुंबईतील तुर्भे, देवनार, भायखळा, अंधेरी, भांडुप, मालाड आणि मुंब्रा परिसरातून काही लोक टिटवाळ्यात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी स्थानिक दलाल, काही अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने बेकायदा चाळी उभारण्याचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप आहे.
सरकारी मालकीच्या बेवारस जमिनींवर झपाट्याने चाळी बांधून प्रत्येकी पाच ते सहा लाख रुपयांना खोल्या विकल्या जात असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
प्रशासनावर संगनमताचे आरोप
बेकायदा बांधकामांमुळे नैसर्गिक नाले, पाणवठे आणि मोकळ्या जागा नष्ट होत असून शहराचे नियोजन बिघडल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. काही स्थानिक राजकीय पुढारी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळेच हा व्यवसाय वाढल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
भूमाफियांची नावे चर्चेत
स्थानिक नागरिकांनी काही कथित भूमाफियांची नावे पुढे आणली असून, विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळी उभारल्याचे सांगितले आहे. यामध्ये अरमान इद्रीसी, शफिक पठाण, नसीम खान, गुड्डू शेख, इरशाद अन्सारी, जुबेर मोगल, अक्रम सिद्दीकी, मोहम्मद गुजर, रव्वाब खान, इक्बाल अन्सारी, नूर मोहम्मद, अविनाश भगत, जाहिद आझमी यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.






