मुरबाड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२६ च्या निकालाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अधिकृत खुलासा करत सीईटीचा संपूर्ण कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच गुणवत्ता यादीमध्ये कोणतीही गडबड अथवा घोटाळा झालेला नसल्याचेही सीईटी कक्षाने म्हटले आहे.
बीई-बीटेक गुणवत्ता यादी संदर्भात सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर सीईटी कक्षाने याबाबत स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या सीईटी गुणवत्ता यादीमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. काही विद्यार्थ्यांमध्ये पर्सेंटाईल आणि परसेंटेज याबाबत संभ्रम असल्याने गैरसमज निर्माण होत आहेत. संबंधित शंका अथवा प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांनी थेट सीईटी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच सीईटी प्रक्रियेचे काम सुरू असल्याचेही कक्षाने स्पष्ट केले आहे.




