श्रीरामपूर प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी राज्यभर ‘एक तळ, एक वन’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी वसुंधरा वृक्ष संवर्धन समिती, श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सोमवारी (दि. १८ मे) झालेल्या या भेटीत महाराष्ट्र कृक्षक समाज संघटनेच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या उपस्थितीत समितीच्या अध्यक्षा निताताई गंभीर आणि सुरेखाताई कडुसकर यांनी निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये गावोगावी तलाव परिसरात वृक्षलागवड व संवर्धनावर आधारित ‘एक तळ, एक वन’ उपक्रम महाराष्ट्र शासनाने व्यापक स्वरूपात राबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्यासोबतच जलस्रोतांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन होण्यास मदत होईल, असे मत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी अधिकाऱ्यांनी उपक्रमाबाबत सकारात्मक भूमिका घेत विविध स्तरावर या विषयाचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.








