बीड (प्रतिनिधी ): मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आनंदवार्ता दिली असून, अण्णासाहेब पाटील – आर्थिक मागास विकास महामंडळासाठी – पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी – वितरित करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापनकरण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजातील प्रलंबित प्रश्न तसेच थकीत व्याज परतावा मिळण्या बाबत अडचणी सोडवाव्यात, यासाठी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत होत्या.
यासंदर्भात डॉ. मेटे यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही वारंवार मागणी केली
होती. २८ मार्च रोजी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करून महामंडळातील थकीत व्याज परतावा तातडीने वितरित करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
शासनाने या मागणीची तत्काळ दखल घेत निधी वितरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना मराठा समाजातून व्यक्त होत आहे.
निर्णयामुळे महामंडळामार्फत लाभ घेणाऱ्या मराठा तरुण उद्योजक, व्यापारी आणि बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा तरुण उद्योजक व व्यापाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांचेही तरुण उद्योजकांकडून आभार मानण्यात आले आहेत.








