युवानेते करण एंड्रलवार यांचा रेल्वे मंत्रालयाकडे थेट पाठपुरावा; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
किनवट | प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमृत भारत योजनेअंतर्गत किनवट रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू असून, रेल्वे स्टेशनचे रूपडे बदलताना दिसत आहे. मात्र, स्टेशनलगतच्या शिवाजीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी युवानेते करण एंड्रलवार यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून थेट रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला असून, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शिवाजीनगर रेल्वे अंडरब्रिजच्या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ उडत आहे. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांचीही गंभीर दखल
अंडरब्रिजचे काम सुरू झाल्यापासूनच नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी या कामाच्या दर्जाबाबत गंभीर दखल घेतली आहे. काम दर्जेदार व्हावे यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.
“अंडरब्रिजची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करावे आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
युवानेते करण एंड्रलवार यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार नोंदवली आहे. “एकीकडे खासदारांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट पद्धतीने होत असताना, दुसरीकडे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अंडरब्रिजचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
रेल्वे स्टेशनप्रमाणेच अंडरब्रिजचे कामही उच्च दर्जाचे व्हावे, अशी मागणी करत त्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण किनवटकरांचे लक्ष लागले आहे.











