श्रीगोंदा | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात मोठी आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाणारी घडामोड समोर येत आहे. तालुक्याच्या राजकारणावर गेली अनेक दशके प्रभाव असलेल्या पाचपुते घराण्यातील सदस्य पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे कनिष्ठ चिरंजीव ॲड. प्रतापभैय्या पाचपुते यांचे नाव या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
४८ वर्षांची परंपरा मोडणार?
सन १९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समितीची निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ४८ वर्षे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणावर पाचपुते घराण्याची मजबूत पकड कायम राहिली आहे.
या प्रदीर्घ राजकीय प्रवासात पाचपुते घराण्याने अनेक निवडणुका जिंकल्या, विविध सत्तास्थाने भूषवली; मात्र आजवर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट सहभाग घेतलेला नव्हता. त्यामुळे प्रतापभैय्या पाचपुते यांच्या संभाव्य उमेदवारीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तगड्या विरोधकांमुळे लढत चुरशीची होणार
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून विविध संस्थांचे ठराव आपल्या गटाच्या उमेदवारांच्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील या जागेसाठी केवळ पाचपुते गटच नव्हे, तर इतर दिग्गज नेतेही सक्रिय झाले आहेत.
राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि दत्तात्रय पानसरे यांसारख्या मातब्बर नेत्यांनीही निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोणाचे पारडे जड ठरणार, कोणाला संस्थांचा पाठिंबा मिळणार आणि सहकाराच्या राजकारणात कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
