रिसोड | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. नांगरणी, रोटावेटर, पेरणीपूर्व मशागत, पाईपलाईन टाकणे यांसारखी महत्त्वाची कामे रखडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारे डिझेलअभावी जागच्या जागी उभी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
दरवर्षी याच काळात शेतात मशागतीची लगबग सुरू असते. मात्र यंदा डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ट्रॅक्टर चालक आणि जेसीबी चालकांनीही हात टेकले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. वेळेत मशागत आणि नांगरणी न झाल्यास आगामी हंगाम उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जागतिक परिस्थिती आणि युद्धजन्य कारणांमुळे इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. “खरेदी महाग आणि विक्री स्वस्त का?” असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डिझेल, खते, खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर वाढतात; मात्र कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे डिझेल टंचाई हा केवळ इंधनपुरवठ्याचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागात डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









