रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरात गुरुवारी सकाळपासून पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल २० नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे उपचार सुरू असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणी फाटा परिसर, रामनगर, आठवडी बाजार, चांदणी चौक तसेच अष्टभुजा गणेश मंदिर परिसरात या कुत्र्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले सुरू केले. लहान मुले, बाजारासाठी गेलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला या कुत्र्याने लक्ष्य केले.
नागरिकांनी आरडाओरड करत तसेच दगड मारून कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत अनेकजण जखमी झाले होते. ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने उपचार आणि रेबीज लसीकरणासाठी धावपळ उडाली.
मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मटन मार्केट परिसरातील घाण, कचरा, हॉटेलमधील उष्टे अन्न आणि मोकळे भूखंड यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण आणि आवश्यकतेनुसार त्यांना शेल्टरमध्ये हलवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस मोहीम राबवली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांची तीव्र मागणी
नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला तातडीने पकडून निरीक्षणाखाली ठेवावे, शहरातील मोकाट कुत्र्यांची श्वानगणना करून निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबवावी, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.










