आजरा कृषी विभागाच्या आढावा बैठकीत सूचना; विविध विषयांवर चर्चा
आजरा : प्रतिनिधी
शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केली. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी समन्वय साधून आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा आणि त्या दिवशी गावात उपस्थित राहून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
आजरा तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे, पंचायत समिती सभापती जयश्री गाडे आणि उपसभापती यशोदा पोवार उपस्थित होत्या.
तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत जालिंदर पांगरे यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवरील विविध कृषी योजना आणि अनुदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत खरीप हंगामाचे नियोजन, बी-बियाणे व खतांचा पुरवठा तसेच बांबू लागवड प्रस्ताव या विषयांवर चर्चा झाली. युवराज पोवार यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती मागितली.
शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी हरीश कांबळे यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय देसाई यांनी वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत असल्याचे सांगत नुकसानभरपाई वाढवण्याची मागणी केली. काशीनाथ मोरे यांनीही यावर आपले मत व्यक्त केले.
कल्पेवाडी बाग, नारायण बाग आणि कृषी चिकित्सालयाच्या जमिनी भांडवलदारांना देऊ नयेत, अशी मागणी दिनेश कांबळे यांनी केली. तर ‘घनसाळ’ तांदळाचा दर्जा टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी समीर चांद यांनी केली.
बैठकीच्या शेवटी जिल्हा तंत्र अधिकारी युकेश्वर गोठणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
या बैठकीस कृषी अधिकारी दीपक मुळे, विजयसिंह दळवी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल यमगेकर, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपसभापती यशोदा पोवार यांनी आभार मानले.









