विद्यार्थी व पालकांची आर्थिक कोंडी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
खटाव प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सेतू कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली असून, काही ठिकाणी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी लाभार्थ्यांकडून पाचशे ते हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक कोंडी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नियमित शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या विभागातील सेतू केंद्र चालकांना योग्य सूचना देऊन शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क आकारण्यास सांगावे, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









