कन्नड तालुका : पिशोर उमाठा पांधी परिसरात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेअंतर्गत विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी सुकर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास गोरड साहेब, भगत मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून परिसरातील शेत पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतात जाणे तसेच पिकवलेला माल बाजारात पोहोचवणे कठीण होत होते. या योजनेमुळे आता रस्त्यांचा कायापालट होणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्चही वाचणार आहे.
कार्यक्रमादरम्यान गोरड साहेब आणि भगत मॅडम यांनी कामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
या रस्ते विकास कामांच्या शुभारंभामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले जात आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.











