कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवतीर्थ जीर्णोद्धाराचे काम गेली तीन वर्षे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि कुरुंदवाड पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस संभाजी भिडे, बाळ महाराज, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, सत्ताधारी व विरोधी आघाडीचे नगरसेवक तसेच शहरातील शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळ महाराज म्हणाले, “शिवतीर्थ पूर्णत्वास जावे ही प्रत्येक शिवभक्ताची तीव्र भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम रखडल्याने शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कामाला गती द्यावी. येत्या एका वर्षात शिवतीर्थाचे काम पूर्ण झाले नाही, तर शिवभक्तांचा संयम सुटेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल.”
तर संभाजी भिडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून शिवविचारांचे प्रेरणास्थान आहे. गेली तीन वर्षे कामाला विलंब होत असला तरी हे कार्य आंदोलनाच्या मार्गाने नव्हे, तर सर्वांच्या सहकार्याने आणि समन्वयातून पूर्ण व्हावे.”
यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी निधी मिळण्यात झालेला विलंब, शासनाकडे वाढीव निधीसाठी पाठवलेला प्रस्ताव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणाऱ्या सात कोनशिला उभारण्याचे नियोजन याबाबत माहिती दिली. शिवतीर्थ स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान बलिदान मास समितीच्या वतीने गौतम पाटील, अमृत चोपडे, नितीश आंबी आणि विनय तनपुरे यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही समिती वेळोवेळी पालिका प्रशासनाशी चर्चा करून कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.










