मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा केला जात असल्याने सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
नागरिकांच्या मते, प्रशासनाने पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करून इंधन वितरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान वाहनासाठी खरेदी करण्यात आलेल्या पेट्रोल किंवा डिझेलच्या पावत्या तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाहन किती अंतर चालले आहे, किती इंधनाची आवश्यकता आहे आणि कोणत्या पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करण्यात आले आहे, याची ऑनलाइन पावती किंवा चलनाच्या माध्यमातून पडताळणी केल्यास चुकीच्या पद्धतीने इंधन साठवणूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनावश्यक चौकशी टाळून केवळ इंधन वापर आणि साठवणुकीवर लक्ष केंद्रित केल्यास पेट्रोल-डिझेल टंचाई रोखता येईल आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलिस विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.









