ता. प्रतिनिधी :
श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे सुरू असलेल्या धोंडे पुरुषोत्तम मासानिमित्त महाअन्नदान कार्यक्रमास मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी भेट देत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कार्याचे कौतुक केले. “साईनाथ महाराजांनी सुरू केलेले अन्नदान, स्वच्छता अभियान आणि सप्तसूत्री कार्य एक दिवस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
माहूर गडावरील आश्रमात 17 तारखेपासून धोंडे जेवण आणि महाअन्नदान कार्यक्रम सुरू असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी स्वच्छता, अन्नदान आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी सुमारे नऊशे वर्षांपूर्वी स्वच्छता अभियानाची शिकवण दिली होती. त्याच आदर्शावर संत गाडगेबाबा यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्याच परंपरेत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनी स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अन्नदान, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, देशभक्ती, शिक्षण आणि जीवोद्धाराचे कार्य सुरू ठेवले असून हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भाऊ पाटील हाडसणीकर, पत्रकार नंदकुमार जोशी, विजय आमले, नानासाहेब पांडे, इलियास बावाणी, अंबादास मुकटे, जवाहरलाल जयस्वाल, एस. एस. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









