जामखेड प्रतिनिधी |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे ऐतिहासिक आणि भव्य विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या १२६० कोटी रुपयांच्या श्रीक्षेत्र चौंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ या कार्यक्रमातून होणार आहे.
हा भव्य कार्यक्रम दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून राज्यभरातील अहिल्याभक्त, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून राम शिंदे हे जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
चौंडीच्या विकासाला नवे बळ
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान म्हणून चौंडीची ओळख संपूर्ण देशभर आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने विशेष विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्याअंतर्गत पर्यटन विकास, रस्ते, सुशोभीकरण, भक्तनिवास, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, उद्याने आणि विविध विकासकामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून स्वागत कमानी, सजावट, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्यभरातील अहिल्याभक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.







