डॉ. कलवले संजय नागनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील जळकोट येथील डॉ. कलवले संजय नागनाथ हे गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पशुसेवा करत शेतकरी व सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र घर उभे केले. त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी यशोगाथा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
डॉ. संजय कलवले यांनी आयुष्यभर शेतकरी, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, फार्मासिस्ट तसेच सर्व धर्मीय लोकांना एकत्र घेऊन समाजात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “पशु सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद मनात ठेवून त्यांनी हजारो जनावरांवर उपचार करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
जनावरांचे आजार, आग बाहेर येणे, जनावर आडणे, सर्पदंश, फर्या रोग, घटसर्प यांसारख्या गंभीर आजारांवर योग्य व खात्रीशीर उपचार करून अनेक मुक्या जनावरांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी दिवस-रात्र धावून जाणे ही त्यांची ओळख बनली आहे. कोणाचाही फोन किंवा मिसकॉल आला तरी तात्काळ संपर्क करून त्यांची विचारपूस करणे आणि शक्य ती मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे.
अत्यंत साधी परिस्थिती असताना त्यांनी स्वतःचा छोटासा प्लॉट खरेदी केला आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. या यशामागे त्यांच्या सासूबाई सौ. सुमनबाई बालाजी गौतम (रा. सेलू आंबा, ता. आंबाजोगाई, जि. बीड) यांची मोठी आर्थिक व मानसिक साथ लाभली. त्यांच्या सहकार्यामुळेच घराचे स्वप्न पूर्णत्वास आले, अशी भावना डॉ. कलवले यांनी व्यक्त केली.
तसेच सद्गुरू माऊली दादा चाकरवाडीकर, माऊली नामदेव दापकेकर यांच्या कृपा-आशीर्वादामुळे आणि संतसंगाच्या सहवासामुळे जीवनाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त जीवन, प्रामाणिक मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावरच आज हे यश मिळाल्याचे ते नम्रपणे सांगतात.
“एक वीट पांडुरंगाच्या भक्तीची,
एक वीट संतांच्या कृपेची,
एक वीट आई-वडिलांच्या संस्कारांची,
एक वीट पत्नीच्या सहकार्याची,
आणि आता हवी आहे एक वीट आपल्या शुभआशीर्वादाची…”
अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची भावना व्यक्त केली आहे. समाजसेवा, पशुसेवा आणि माणुसकी जपणाऱ्या डॉ. संजय कलवले यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









