कन्नड | प्रतिनिधी
अधिक मासाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या भक्तिभावात पार पडली. या निमित्त विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास उपस्थिती लावली.
सप्ताहाच्या अंतिम दिवशी गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांचे भावपूर्ण आणि रसाळ शैलीतील काल्याचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. या कीर्तनाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अंबादास दानवे म्हणाले,
“वारकरी संप्रदायाची परंपरा समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे कार्य करते.”
कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुकाप्रमुख संजय मोटे, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, दीपक नाना बोडके, चांगदेव सावडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देभेगाव आणि परिसरातील हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.
संपूर्ण सप्ताह यशस्वी पार पडण्यासाठी सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.









