शहादा (नंदुरबार) | प्रतिनिधी | २४ मे
आदिवासी बहुल व आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबारच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (REPM) उत्पादन प्रकल्प जिल्ह्यात स्थापन करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद नगीन पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. मोठ्या उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे येथील युवकांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरात तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठे आणि शाश्वत उद्योग उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. पाटील यांच्या मते, हा अत्याधुनिक प्रकल्प नंदुरबारमध्ये सुरू झाल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, तसेच पूरक उद्योगांचे जाळे निर्माण होऊन आर्थिक विकास वेगाने होईल.
या प्रकल्पामुळे “आत्मनिर्भर भारत” अभियानाला बळ मिळेल आणि नंदुरबार जिल्हा औद्योगिक नकाशावर मजबूत स्थान निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“रोजगार, विकास आणि आत्मनिर्भर नंदुरबार” हेच आपले मुख्य ध्येय असून या मागणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
या मागणीमुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








