लोणार | प्रतिनिधी
लोणार नगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चर्चेत आले असून उद्यानातील सुरक्षा व सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उद्यानातील हरणाची मूर्ती गायब झाल्याची घटना, रात्रीच्या वेळी बंद असणारे दिवे आणि त्यामुळे निर्माण होणारा अंधार यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी हे उद्यान असुरक्षित ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या उद्यानाकडे प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्यासारखे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अंधाराचा फायदा घेत संशयित व्यक्तींची वर्दळ वाढत असल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक श्यामभाऊ राऊत यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “उद्यान हे जनतेच्या विश्वासाचे ठिकाण आहे. येथे सुरक्षितता आणि सुविधा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हरवलेली हरणाची मूर्ती शोधून काढावी, लाईट व्यवस्था तत्काळ सुरू करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे.”
तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा घटना होऊ नये यासाठी सतर्क राहणे अधिक महत्त्वाचे आहे.”
याच पार्श्वभूमीवर सामाजिक नेते कैलास भाऊ अंभोरे यांच्या वक्तव्याचीही चर्चा सुरू असून, “उद्यानात हरण हरवलं… पण प्रशासनाची जबाबदारी त्याआधीच हरवलेली दिसते,” अशी प्रतिक्रिया परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
नागरिकांकडून उद्यानाची तातडीने दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि प्रकाशयोजना सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.








