सेलू, ता. प्रतिनिधी –
सेलू शहराचा विस्तार होत असताना शहरात विविध ठिकाणी प्रवाशी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र, विकास चौकातील प्रवाशी निवारा पूर्णतः शोभेची वास्तू ठरल्याचे चित्र दिसत आहे. येथे बस न थांबल्यामुळे प्रवाशांना आजही जुन्या पिंपळवृक्षाच्या सावलीखाली उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
विकास चौक (बोर धरण फाटा) येथे एसटी महामंडळाने लाखो रुपये खर्च करून प्रवाशी निवारा बांधला. मात्र चुकीच्या ठिकाणी नियोजन झाल्याने या निवाऱ्याचा उपयोग प्रवाशांना होत नाही. या चौकातून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असले तरी बहुतांश बसेस आता या मार्गाने जात नाहीत.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी ज्या पिंपळवृक्षाखाली थांबत होते, तोच आजही त्यांचा मुख्य आधार ठरत आहे. तहसील कार्यालय, कृषी, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात हा चौक असूनही प्रवाशांची गैरसोय कायम आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बांधलेले प्रवाशी निवारे आता उपयोगात नसून अडगळीत पडले आहेत. तर काही नव्या मार्गांमुळे बससेवा बदलल्याने विकास चौकातील निवारा पूर्णतः निरुपयोगी ठरला आहे.
दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या काही इलेक्ट्रिक बसेस मात्र या चौकात थांबत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही बहुतांश लांब पल्ल्याच्या बसेस आता या मार्गाला टाळत असल्याने प्रवाशांचा त्रास कायम आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रवाशी निवाऱ्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग वाढवावा, अशी मागणी केली आहे.









