कोपरगाव प्रतिनिधी –
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीतील हाळनोरवस्ती येथे काल झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत उन्हापासून संरक्षण व दर्जेदार उत्पादनासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभारून डाळिंब बागांवर क्रॉप कव्हर बसवले होते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे काही क्षणातच अनेक महिन्यांचे परिश्रम व लाखो रुपयांची गुंतवणूक उद्ध्वस्त झाली.
वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांवरील संपूर्ण क्रॉप कव्हर उडून गेले असून लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. तसेच झाडांवरील तयार डाळिंब फळे खाली पडल्याने उत्पादनाचेही मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एका शेतकऱ्याचेच सुमारे साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो १७० ते १८० रुपये दर मिळत असताना, हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावले गेल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्याप सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर महसूल विभागाशी संपर्क साधला असता या घटनेबाबत अनभिज्ञता असल्याचे समोर आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.









