परभणी –
पाथरी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, ऊस, पपई, आंबा तसेच इतर फळपिकांना मोठा फटका बसला असून अनेक एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कासापुरी, पाथरगव्हाण खुर्द, बाबुलतार, जेतापूरवाडी, वरखेड आणि हादगाव बु. या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा बसला. अनेक ठिकाणी केळीच्या बागा उन्मळून पडल्या असून पपई व आंब्यांच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार भरत गंगावणे यांनी नुकसानग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत. सर्व तलाठ्यांना संबंधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करून सोमवारी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कासापुरी येथे ३३ शेतकरी बाधित होऊन सुमारे २४ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. पाथरगव्हाण खुर्द येथे २४ शेतकऱ्यांच्या १८ हेक्टर क्षेत्रावरील केळी व आंबा बागांचे नुकसान झाले आहे. बाबुलतारा येथे ५ हेक्टरवरील केळी व ४ हेक्टरवरील पपई पिकांचे नुकसान झाले आहे. जेतापूरवाडी येथे ४ हेक्टरवरील केळी तसेच इतर फळपिकांचे सुमारे ५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. वरखेड येथे २५ शेतकऱ्यांच्या १७ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले असून हादगाव बु. येथे पाच घरांचेही नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आली आहे. तसेच सुमारे २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकालाही मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. वाढते उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता या अवकाळी संकटामुळे दुहेरी आर्थिक भार पडला आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यानंतर बाधित क्षेत्र व शेतकऱ्यांची अंतिम संख्या निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“पाथरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
— राजेश विटेकर, आमदार









