शहादा | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा शहादा शहरात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. १६ ते ३१ मे या कालावधीत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्याचे आदेश असतानाही शहरातील अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक पोहोचले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यात नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरली असली तरी दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन सुमारे ३५ ते ४० प्रश्नांची माहिती नोंदविणे अपेक्षित आहे. मात्र, शहादा शहरातील अनेक भागांत जनगणना कर्मचाऱ्यांचे दर्शनही झालेले नाही.
तर दुसरीकडे ग्रामीण भागात हे काम सुमारे ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील कामाच्या गतीत मोठा फरक दिसून येत आहे.
नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची स्थिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी “आमच्या भागात अद्याप प्रगणक आलेले नाहीत, अंतिम तारीख जवळ आली असताना काम इतके संथ का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनगणना कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










