जिवती / ता. प्रतिनिधी
जिवती तालुक्यात अचानक आलेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तालुक्यातील पिटीगुडा क्र. १ येथे जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी परेमदास पवार यांचा बैलांचा गोठा कोसळल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की, पवार यांच्या घराशेजारी असलेला बैलांचा गोठा काही क्षणात जमीनदोस्त झाला. गोठ्याचे छप्पर, लाकडी साहित्य तसेच बांधकामाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गोठा कोसळल्याने जनावरांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र गोठ्याच्या नुकसानीमुळे शेतकरी परेमदास पवार यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनावरही अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत गोठा कोसळल्याने जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पुन्हा गोठा उभारण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे आणि जनावरांच्या निवाऱ्यांचे नुकसान होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून बाधितांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.











