कारंजा / तालुका प्रतिनिधी जी. के. सारथी महाराष्ट्रचा
कारंजा तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ग्रामपंचायतींची अनेक कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया अपेक्षित होती, मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नियुक्त्या न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाचा जीआर तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच पदावरील परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही प्रशासक नेमण्यात आले नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणारी विविध विकासकामे, शासकीय योजना, नागरिकांची प्रमाणपत्रे, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर प्रशासकीय कामे रखडल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना विविध कामांसाठी ग्रामपंचायतीत हेलपाटे मारावे लागत असून संबंधित कामे वेळेत होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय व्यवस्था नसल्यामुळे विकासकामांचा वेग मंदावला असून अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे गावपातळीवरील प्रशासन अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतींमध्ये तातडीने प्रशासकांची नियुक्ती करावी व रखडलेली कामे सुरळीत सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






