आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरीद) उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा; आर्थिक उलाढालीने बाजाराला गती
आजरा (प्रतिनिधी,):
येथील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत ईद-उल-अजहाँ म्हणजेच बकरीद सण अत्यंत उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. या पवित्र सणानिमित्त आजरा परिसरामध्ये धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
धार्मिक विधी आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना
ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाज पठणासाठी अंदाजे पाच ते सहा हजार मुस्लिम बांधवांचा मोठा जनसमुदाय जमला होता. यावेळी मौलाना जक्रिया काकतीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करणारे विशेष प्रवचन (खुत्बा) दिले. मुख्य नमाज पठण आणि सामूहिक दुवा हाफिज नईम मुराद यांनी करून घेतली. तर कुतबा पठण हाफिज अल्ताफ नेसरीकर यांनी केले.
यावेळी देशात आणि जगात शांतता लाभावी, तसेच जे नागरिक गंभीर आजारी आहेत, अडचणीत आहेत किंवा कर्जबाजारी आहेत, त्यांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर अत्यंत शिस्तीत, कोणताही गोंधळ, दंगा किंवा चेंगरचेंगरी न होऊ देता सर्वांनी शिस्तबद्ध रांगेत येऊन आपल्या मृत नातेवाईकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली व कुर्बानीच्या विधीसाठी सर्वजण आपापल्या घरी रवाना झाले.
बकरीद सणाचे महत्त्व आणि सामाजिक संदेश
बकरीद हा सण त्याग, शांती आणि बलिदानाचा संदेश देणारा सण आहे. प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या काळापासून कुर्बानी देण्याची ही परंपरा अविरत सुरू आहे. धार्मिक नियमांनुसार, ज्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त मालमत्ता आहे, त्यांनी धष्टपुष्ट, निरोगी आणि हलाल जनावर खरेदी करून त्याची कुर्बानी द्यायची असते. या मांसाचे समान तीन हिस्से केले जातात; ज्यातील एक हिस्सा स्वतःच्या घरासाठी, दुसरा हिस्सा भाऊबंद व नातेवाईकांसाठी आणि तिसरा हिस्सा गरीब व गरजू लोकांमध्ये वितरित केला जातो. या परंपरेमुळे गरीब व गरजू लोकांना चांगले आणि पौष्टिक अन्न मिळते.
ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना
या सणामुळे देशाच्या आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या आर्थिक उलाढालीत मोठी भर पडते. गोरगरीब शेतकरी, धनगर समाज आणि पशुपालक यांना या काळात त्यांच्या जनावरांना चांगली किंमत मिळाल्याने मोठा आर्थिक लाभ होतो व त्यांच्या अडचणी दूर होतात. एकट्या मुंबईतील देवनार बाजारपेठेत या काळात सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल होते.
याशिवाय नवीन कपडे, अत्तर, सुकामेवा, दूध, शेवया यांच्या खरेदीमुळे बाजारपेठेत प्रचंड तेजी असते. जनावरांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य, चारा आणि खाद्याचा व्यवसायही तेजीत असतो. थोडक्यात सांगायचे तर, काही दिवसांच्या या सणाच्या काळात जनावरांच्या व्यापारामुळे हजारो कोटी रुपयांची उलाढाल होऊन देशातील कृषी, मांस आणि किरकोळ व्यापार क्षेत्राला मोठी गती मिळते.
कडक पोलीस बंदोबस्त
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात व ईदगाह मैदान परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस अनंत देसाई तसेच नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई प्रशासकीय जबाबदारीसाठी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांमुळे हा उत्सव शांततेत आणि सलोख्याने संपन्न झाला.











