चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण
श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी ते विसापूर दरम्यान 5 किलोमीटर अंतरापैकी चांभुर्डी बाजूकडून सुमारे 4 किलोमीटर रस्ता चांगल्या दर्जाचा झाला आहे. मात्र विसापूरजवळचा 500 ते 600 मीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या उर्वरित खराब रस्त्यामुळे वाहनचालक,नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चांभुर्डी,सारोळा आणि कोरेगव्हाण या भागातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी ,बाजारपेठेसाठी आणि इतर कामांसाठी नेहमी विसापूरला यावे लागते .तसेच या परिसरातील अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी विसापूर येथील विद्यालयात याच रस्त्याने ये – जा करतात.चार किलोमीटर रस्ता उत्तम दर्जाचा झाला असल्यामुळे तिथपर्यंत वाहने वेगाने येत असतात .मात्र विसापूरजवळ येताच अचानक सुरू होणाऱ्या खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.
पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय होते खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही .ज्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. संपूर्ण 5 किलोमीटर रस्ता पूर्ण का झाला नाही ? 500 मित्राचा तुकडा का रखडला ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या मार्गावरील वाहतूक आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या रखडलेल्या कामाची दखल घ्यावी आणि हा रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.











