सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले आणि वेदगंगेच्या पवित्र प्रवाहाने समृद्ध झालेले भुदरगड तालुक्यातील ‘पाटगांव’ हे गाव आज केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेढून घेत आहे. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ मौनी महाराज यांच्या भेटीचा दैदिप्यमान इतिहास, दुसऱ्या बाजूला प्राचीन देवस्थानांचे आध्यात्मिक कोंदण आणि आता ‘मधाचे गाव’ म्हणून मिळालेली नवी ओळख, यांमुळे पाटगांवने आधुनिक काळात विकासाचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
इतिहास आणि निसर्गाने ज्या भूमीला भरभरून दिले, त्या भूमीने आपल्या वैशिष्ट्यांचा वापर करून आत्मनिर्भरतेकडे कशी पावले टाकावीत, याचे पाटगांव हे उत्तम उदाहरण आहे. महाबळेश्वरच्या मांगघरनंतर राज्याबाहेरही कौतुक होत असलेले ‘मधाचे गाव’ हा बहुमान पाटगांवला मिळाला, तो तिथल्या निसर्गसंपदेमुळे आणि गावकऱ्यांच्या कष्टांमुळे. सह्याद्रीच्या जंगलातील औषधी वनस्पती आणि फुलांवर पोसलेल्या मधमाशांमधुन निर्माण होणारा शुद्ध मध आज पाटगांवला एक नवी आर्थिक ताकद देत आहे. हा केवळ मधाचा व्यवसाय नसून, निसर्गाचे संतुलन राखत शाश्वत रोजगाराची निर्मिती करणारा एक यशस्वी प्रयोग आहे.
पाटगांवच्या मातीला एक वेगळाच सुगंध आहे, तो म्हणजे शिवस्पर्शाचा. इतिहासाचा धांडोळा घेतल्यास ऐतिहासिक ‘९१ कलमी बखरी’मध्ये या भूमीचे महत्त्व अधोरेखित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची आणि प्रभूकार्याची गोष्ट या बखरीत नमूद आहे. त्यानुसार, सन १६७६ मध्ये जेव्हा महाराज आपल्या ७६ व्या कलमात नमूद असलेल्या ‘कर्नाटकच्या दक्षिण दिग्विजय’ मोहिमेवर जाण्यास निघाले, तेव्हा ते मुद्दाम पाटगांव येथे आले. तेथील सत्पुरुष श्री मौनी महाराज यांचे त्यांनी दर्शन घेतले व आशीर्वाद मिळवला. अशी धारणा आहे की, या अलौकिक आशीर्वादामुळेच महाराजांची ही दक्षिण मोहीम यशस्वी झाली.
या ऐतिहासिक प्रसंगाला एक भावनिक आणि तितकीच भव्य किनार आहे. ही यशस्वी मोहीम फत्ते करून परत येत असताना, राजे पुन्हा एकदा मौनी महाराजांच्या दर्शनासाठी पाटगांवला आले. परंतु, तोपर्यंत मौनी महाराजांनी आपले इहलोकीचे कार्य संपले असे मानून जिवंत समाधी घेतली होती. या समाधीवर भव्य देवालय बांधण्याची सुरुवात स्वतः शिवछत्रपतींनी केली, हा इतिहास आजही रोमांच उभा करतो. संपूर्ण ९१ कलमी बखरीत शिवरायांनी इतर कोणत्याही संतांची अशी भेट घेतल्याचा उल्लेख आढळत नाही, यावरूनच मौनी महाराजांचे थोरपण आणि त्यांचा तत्कालीन लौकिक स्पष्ट होतो. आज हे समाधी स्थळ हजारो भक्तांना आणि इतिहासप्रेमींना ऊर्जा देत असते. या ऐतिहासिक मठाच्या छायेत आणि रंगनागडाच्या साक्षीने वसलेल्या या गावात शिवकाळातील पाऊलखुणा आजही तितक्याच जिवंत वाटतात. त्यातच, वेदगंगेच्या खोऱ्यातील शंकराची प्राचीन देवस्थाने या परिसराला एका अलौकिक शांततेचा अनुभव देतात.
आज जेव्हा ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहेत, अशा काळात पाटगांवने इतिहास, पर्यटन आणि निसर्गपूरक व्यवसायांची सांगड घालून स्थानिक पातळीवरच समृद्धी आणली आहे. ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि आता ‘अॅग्रो-टुरिझम’च्या (कृषी पर्यटन) माध्यमातून मधाच्या पोळ्यांची सफर, यांमुळे पाटगांव हे पर्यटकांचे आवडते केंद्र बनत आहे.
थोडक्यात सांगायचे तर, पाटगांवचा हा प्रवास अत्यंत कौतुकास्पद आहे. इतिहास जपताना वर्तमानात निसर्गाच्या सोबतीने आर्थिक क्रांती कशी घडवता येते, हे पाटगांवने दाखवून दिले आहे. मधाचा गोडवा, इतिहासाचे शौर्य आणि महादेवाच्या मंदिरातील सात्त्विकता यांचा हा त्रिवेणी संगम महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देणारा ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. पाटगांवच्या या पॅटर्नचे संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरण व्हायला हवे, हाच या निमित्ताने मुख्य विचार आहे.
संकलन – गोपाळ गडकरी, आजरा










