जळकोट / प्रतिनिधी
दिनांक २८ मे २०२६ रोजी जळकोट शहरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ८.३० वाजता ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली.
यावेळी जळकोट शहरातील मुस्लिम बांधवांसह ज्येष्ठ नागरिक, नवतरुण मंडळी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमाजानंतर ईद-उल-अजहाचे धार्मिक महत्त्व सांगण्यात आले. कुर्बानीचे महत्त्व, त्याग, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत समाजात शांतता, एकोपा आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनही सतर्क होते. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नमाज पूर्ण झाल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जळकोट शहर आणि परिसरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
ईदचा सण शांततेत आणि सामाजिक सलोखा जपत पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.









