जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत परिसरात सोमवारी दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून बैलगाडीतील दोन बैल जागीच ठार झाले. सुदैवाने बैलगाडीतील पाच शेतकरी थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकत परिसरातील शेतकरी संभाजी वराट हे आपल्या कुटुंबासह बैलगाडीतून शेताकडे जात होते. बैलगाडीत पाच जण प्रवास करत होते. दरम्यान, रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या जिवंत वीजवाहिनीवरून बैलगाडी गेल्याने बैलांना जोरदार विजेचा धक्का बसला.
वीजप्रवाह सुरू असल्यामुळे दोन्ही बैल जागीच मृत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाडीत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे बैलगाडीतील सर्वजण सुरक्षित बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेत संभाजी वराट यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलांची जोडी गेल्याने संबंधित शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे साकत परिसरासह संपूर्ण जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रस्त्यावर जिवंत विजेची तार पडलेली असताना महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पीडित शेतकरी कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.









